Subscribe Us

WELCOME TO MY WEBSITE "MY YOUTUBE CHANNEL,CLICK ME " youtube.com channe , THANKS FOR

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती,

नमस्कार मित्रहो शैक्षणिक जागर या ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. या पेज मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती,देण्यात आली आहे. . 💠 महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 💠
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान वर्ण आणि कार्य भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, दलितोद्धारक अशा विविध रूपांनी आपल्याला सुपरिचित असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
🔹 नाव  :भीमराव रामजी आंबेडकर.
🔹 जन्म:१४ एप्रिल १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला
🔹 जन्म ठिकाण: मध्य प्रदेशातील महू या गावी झाला.   

🔘 जिवन परिचय :

             रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. लष्करात सुभेदार म्हणून नोकरीस असणारे त्यांचे वडील पुढे साताऱ्यास स्थायिक झाल्यामुळे आंबेडकरांचे बालपण सातारा येथे गेले. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांचे कुटुंब मुंबईला आले.

🔘 उच्च शिक्षण:

               इ.स. १९०७ मध्ये बाबासाहेब मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१२ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१३ साली ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाले. तेथील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. इ. स. १९१५ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची एम.ए. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याच विद्यापीठाने त्यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पी.एच.डी. ही पदवी बहाल केली. अमेरिकेतील अभ्यास पूर्ण करून डॉ. आंबेडकर कायदा व अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. परंतु आर्थिक अडचणीमुळे तेथील शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले.इ.स. १९२० साली डॉ. आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बी.एस्सी. व डी.एस्.सी. या पदव्या संपादन केल्या. याच वास्तव्यात 'बार अॅट लॉ' (बॅरिस्टर) ची पदवी प्राप्त करून इ.स. १९२३ मध्ये ते मायदेशी परतले त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. पुढे मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

🔘 कार्य :

             प्राध्यापक म्हणून काम करते वेळी त्यांनी सार्वजनिक कार्यांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदांमध्ये ते सहभागी झाले. . मग त्यांनी आपले सार्वजनिक काम अधिक जोमाने सुरू केले. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी 'बहिष्कृत हितकारीणी सभा' या संस्थेची स्थापना केली. व ते समाजसुधारणेचे कार्य करू लागले. इ.स. १९२७ मध्ये मुंबई कायदेमंडळाचे सदस्य म्हणून ते नियुक्त झाले. येथून त्यांच्या राजकीय जीवनास प्रारंभ झाला. डॉ. आंबेडकरांच्या काळात भारतात चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, सरंजामशाही या वाईट रीतींचे अधिराज्य होते, दलित, आदिवासी, भटके विमुक्त हे सर्वच हालाखी, अन्याय, अस्पृश्यता, दास्य, अज्ञान, यात खितपत पडले होते. हा सर्व समाज जणू निश्चेष्ट लोळागोळा झाला होता. डॉ. आंबेडकरांनी आपल्या तेजस्वी विचारांनी या समाजाच्या प्राणांमध्ये फुंकर घालून चेतना आणली. त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार व न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यास जागृत केले. 'अस्पृश्य' हेही याच देशाचे नागरिक आहेत. व या देशावर इतर कोणाही नागरिकाइतकाच त्यांचाही अधिकार आहे अशी भीमगर्जना त्यांनी केली.
              अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रश्नाला त्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. अस्पृश्यांना पाणी भरण्यास मज्जाव असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्याचे पाणी डॉ. आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडला सत्याग्रह करून अस्पृश्यांसाठी खुले केले. २ मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांनाही प्रवेश करता यावा म्हणून त्यांनी सत्याग्रह करून हिंदू मंदिरांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले केले. अस्पृश्यता व स्त्रीदास्य यांचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली. या सर्व प्रतीकात्मक कृर्तीमधून डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांची अस्मिता जागृत केली, त्यांना सुधारणेचा मार्ग दाखविला. अस्पृशांनाही न्याय देण्यात यावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी सर्वतोपरी अथक प्रयत्न केले. पण तरीही सवर्णांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्माच्या प्रदीर्घ व सखोल अभ्यासानंतर डॉ. आंबेडकरांना या धर्माची तत्त्वे पटली. या धर्माचे श्रेष्ठत्व पटले. ज्या भगवान बुद्धांनी पद्दलित जनतेला आपल्या धर्माचे दरवाजे खुले केले, समतेवर उभारलेल्या बौद्ध धर्माची डॉ. आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली.अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कार्यावरही त्यांनी भर दिला... कारण शिक्षण घेतल्यानेच अस्पृश्यांची उन्नती होईल हे त्यांना उमजले होते. म्हणून त्यांनी तरुण तसेच प्रौढ दलित व्यक्तिसाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरू करणे असे उपक्रम राबविले. इ.स. १९४६ मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज ही महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था सुरू केल्या. दलित विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे चालवली. जुन्या रूढी, परंपरा तोडून दलितांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून देण्याचे डॉ. आंबडकरांचे महान कार्य ऐतिहासिक ठरले. अस्पृश्यतेच्या रूढीचे चटके बसलेल्या स्वतः डॉ. आंबेडकरांच्या व्यापक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यामागे अस्पृश्यांचे हितरक्षण व अस्पृश्योद्धार या प्रखर प्रेरणा होत्या. आपल्या दलित मुक्ती संग्रामातून त्यांनी दलितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांची अस्मिता जागृत केली. त्यांना सामाजिक व राजकीय समता व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नव्या सुधारणा व उन्नतीचा मार्ग दाखवून दिला. दलित समाजास सन्मान, स्वाभिमान व तत्त्वप्रणालींची पक्की बैठक दिली. केवळ अस्पृश्यांसाठीच नव्हे तर रूढींमध्ये भरडल्या जाणाऱ्या, कोणतेच प्रतिष्ठेचे सामाजिक स्थान व स्वातंत्र्य नसणाऱ्या सर्वच भारतीय स्त्रियांसाठी डॉ. आंबेडकरांनी प्रगतीशील विचार मांडले. त्यानुसार कृतीही केली. स्त्रीस्वातंत्र्याचा हिरीरीने पुरस्कार केला. त्यांनी भारतीय स्त्रीच्या स्वत्वाची, स्वातंत्र्याची, अस्मितेची मंगलमय पहाट जागवली. तिला तिच्या अर्थपूर्ण अस्तित्वाची जाणीव करून दिली. स्त्रीच्या अंधारमय जीवनात उन्नतीचा नवा प्रकाश आणणारे डॉ. आंबेडकर हे देदिप्यमान सूर्य ठरले. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या रूपाने स्त्रीचे जीवनव्यापी गौणत्व नाहीसे करून तिला कायद्याने समानता मिळवून दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व दयाळू प्रज्ञेमुळे भारतीय स्त्री आज मुक्तीचा, सुटकेचा श्वास टाकू शकली. स्त्रियांची आज जी नवी पिढी उदयास येत आहे त्याचे सारे श्रेय या कायदाभास्कराला आहे. आपल्या देदिप्यमान व खंबीर आचार विचारांनी दलितांच्या व स्त्रियांच्या जीवनात नवी पहाट, आणली.

🔘 राजकीय कार्य :

                 भारतीय राजकारणातही डॉ. आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इ.स. १९३० ते १९३२ च्या दरम्यान इंग्लंडमधील तीन गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. अस्पृश्यांसाठी राखीव जागा मान्य करणारा 'पुणे करार' त्यांनी महात्मा गांधीजींबरोबर केला. इ.स. १९३७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. १९४२ मध्ये त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ह्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून अस्पृश्यांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. डॉ. आंबेडकर भारताच्या घटना समितीचे सभासद होते. तिच्याच मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणून आपण त्यांना गौरवितो.

🔘 भारतरत्न पुरस्कार:

           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १४ एप्रिल १९९० रोजी त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान भारत सरकारने मरणोत्तर प्रदान केला. त्यायोगे या महापुरुषाच्या कार्याचा गौरव करून या सन्मानाची सर्वोच्चता सिद्ध झाली. 

🔘 मृत्यू:

             नवा प्रकाश घेऊन येणारा हा क्रांतिसूर्य दिनांक ६ डिसेंबर १९५६ रोजी अस्तंगत झाला. या दिवशी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे महानिर्वाण झाले.
 🔷 त्यांच्या जंयती निमित्ताने महामानवाला विनम्र अभिवादन 
 ------------------------------------ 
 🔷 महात्मा ज्योतिबा फुले परिचय ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या